मणिपूर ( वृत्तसंस्था ) आसाम रायफल्सच्या एका जवानाने मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्यानंतर आत्महत्या केली. या घटनेत किमान सहा जवान जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ही घटना मणिपूरच्या साजिक टँपक परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने स्वत:वर गोळी झाडली आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.मणिपूर पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या दुर्दैवी घटनेचा राज्यातील चालू असलेल्या जातीय संघर्षाशी संबंध जोडू नये कारण जखमींपैकी कोणीही मणिपूरचा नाही. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.