कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यात नेत्यांना घेराव घातले जात आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन जिल्ह्यात वातावरण तापलं असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेससह सहा आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याची भुमिका आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केली आहे.


पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, आम्ही सहा ही आमदार सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित करत करत असून, ती कायम राहिल. आरक्षण देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत तसेच आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला द्या व विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा निर्णय घ्या अशी ही मागणी यावेळी केली.

यावेळी ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे व आमदार जयश्री जाधव यांनी याबाबतची सविस्तर माहिती देत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही कायम सोबत असल्याची भुमिका व्यक्त केली हीच भुमिका काल आज आणि उद्या ही कायम राहिल असे ही ठामपणे सांगितले.


सतेज पाटील म्हणाले, आत्ताच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या फार काही हाताला लागलेलं नाही. वास्तविक आजच्या या दिवसाची महाराष्ट्रातील मराठा जनता उत्सुकतेने वाट पहात असताना मंत्री उपसमितीच्या बैठकीत काहीच ठोस निर्णय झालेला नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक केंद्र शासनाकडे जावून याबाबत आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याऐवजी महायुती शासन हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याच्या मानसिकतेत आहे असे दिसत असल्याचा आरोप ही यावेळी केला.

दरम्यान गेले काही दिवस राज्यभर आंदोलन पेटले असताना काहीही ठोस जाहीर न करणे ही एक प्रकारची मराठा समाजाची फसवणूक आहे. या प्रश्र्नी राज्य सरकार शंभर टक्के अपयशी ठरले आहे. सरकारने शब्द दिला तो पाळला असता तर आज भडका उडाला नसता.

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा करून निर्णय घ्यावा. केंद्र शासनाने घटनादुरूस्ती करून आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला द्यावेत. या सरकारची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा नाही असे आमदार पी एन पाटील यांनी म्हटले.