मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून उलथापालथ होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चुरस असल्याचे चित्र आहे. जागावाटपावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार (Ajit Pwar) गटामध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. अशात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवारांनी “अजित पवार गटाच्या 22 आमदारांना शरद पवारांकडे परत यायचं आहे, असा मोठा दावा केला आहे.

“अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 22 आमदारांना पुन्हा शरद पवारांसोबत यायचे आहे. तर, 12 आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असे वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. लोकसभेच्या जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु असतानाच रोहित पवारांनी (Rohit Pawar) हा दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाकडून रोहित पवारांच्या विधानावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा जगावाटपावरून भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत बोलतांना रोहित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात वाद होणारच होता. त्याबरोबरच भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात देखील वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठी खदखद असून, बऱ्याच लोकांना बीजेपीच्या चिन्हावर निवडणूक लढायची आहे. तसंच अजित पवारांच्या पक्षातील बऱ्याच आमदारांना देखील भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे. ज्यात 12 आमदारांचा समावेश आहे. तर, 22 आमदारांना पुन्हा एकदा शरद पवारांकडे परत यायचं आहे. त्यामुळे हा वाद हळूहळू वाढत जाणार आणि यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अजित पवारांच्या पक्षाचे नुकसान होणार असल्याचं रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, “दादांनी जेव्हा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं, लोकांच्या मनामध्ये घर केलेला एक मोठा नेता, भाजपने राजकीय दृष्ट्या संपवलं आहे. कारण भाजप नेत्याला जवळ करतो आणि संपवून टाकतो. भाजप ज्या राजकीय पक्षांना जवळ करतो त्यांना संपवून टाकतो. पण ते एवढ्या लवकर होईल हे माहीत नव्हतं. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना 9जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु 9 ऐवजी आता त्यांना चारवरच आनंद साजरा करावा लागणार आहे. लोकसभेत अशी परिस्थिती असेल तर कदाचित विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभं राहणार नाही. सर्वच भाजपच्या पक्षाकडून उभे राहतील. त्यामुळे दादाचे 12 अशी लोकं आहेत जे अजित दादांनी भाजपमध्ये जावं असं सांगत असल्याचे” रोहित पवार म्हणाले.

जागा वाटपवरून मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांवर दबाव

लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 तर, अजित पवार गटाकडून 10 जागांची मागणी केली आहे. परंतु भाजपला हा प्रस्ताव मान्य नाही. भाजप शिंदे गटाला 8 आणि अजित पवार गटाला 4 जागा देण्याच्या तयारीत आहे. पण शिंदे आणि पवार यांना मान्य नाही. भाजपकडून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समजूत काढण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी भाजप दबाव तंत्राचा वापर करत आहे. भाजप आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गोची होणार आहे.