पंढरपूर (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे श्रीविठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. आधी मला आषाढी एकादशी, आता कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या.

कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते. आज पहाटे मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व कलावती साळुंखे यांच्यासह त्यांनी विठ्ठलाची महापूजा केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा, हीच मागणी विठ्ठलाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी आणि कार्तिकी एकादशीची पूजा करण्याचा मान मिळणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेते आहेत. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. तर आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मानही मिळाला.

महापूजेनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. भाविकांना रांगेत जास्त वेळ लागणार नाही, भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील याचा विचार आम्ही आराखडा तयार करताना करत आहोत. त्या पद्धतीने कामे करण्यात येतील. तिरुपतीला गर्दी काळात पण दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागतेच. यामुळे भाविकांना जो पॅटर्न सोयीचा आहे, तो पॅटर्न आम्ही पंढरपूरला राबवू.

फडणवीस म्हणाले, जवळपास दोन हजार कोटींचा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे. नवीन सोईसुविधांमुळे वारकऱ्यांच्या पंरपरेला बाधा होईल, असे कोणतेही काम करण्यात येणार नाही. याबाबत काळजी घेण्यात येईल. तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम करताना मंदिर परिसरात काही ठिकाणी भू-संपादन करावे लागेल. ते करत असताना बाधित लोकांचे योग्य रितीने पुनर्वसन करण्यात येईल. कोणीही विस्थापित होणार नाही याची दक्षता घेऊ. मात्र, ज्यांच्या जागा घेऊ, त्यांना योग्य मोबदला, त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याच येईल.

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप व विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.