मुंबई : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक देखील पाऊस न पडल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचमुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ४० तालक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच, दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यात यंदाच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे, त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यातील मदतीबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मदतीबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाकडून पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती देण्यात आली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट झाली आहे. ज्यामुळे रब्बी पेरण्या संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.