मुंबई : महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. यानंतर वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका पत्राद्वारे वंचितचा लढा केवळ सत्ताधारी भाजपशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या लढती केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि भाजपत आहेत. त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई केवळ वंचित आणि भाजपत आहे, असे ते म्हणालेत.

वंचितची महाविकास आघाडीशी बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने राज्यात ३५ उमेदवार जाहीर केले असून काही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी या पत्राच्या माध्यमातून वंचितच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका. त्याचा सत्याने सामना करा आणि तुमचा संयम गमावू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

प्रकश आंबेडकर यांचे पत्र जाशात तसे
वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो, तुमच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडीत कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.

येत्या शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर येथील मतदार मतदान करून आपापले प्रतिनिधी निवडतील. या मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे.

आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागा वाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली.
आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची. हे केवळ आपले स्वप्न नाही; तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते; ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण हे ७० वर्षांचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.