कपिलेश्वर (प्रतिनिधी) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालय ट्रस्टच्या जुन्या विश्वस्थांना कायम केल्याचा मा. धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी निर्णय दिला आहे. देशभरातल्या अखंड सद्गगुरू बाळूमामा भक्तांना मोठा दिलासा दिला असल्याचा़ी प्रतिक्रिया अनेक भक्तांनी दिली. गेले दिड ते दोन वर्ष चाललेल्या या लढ्याला अखेर योग्य तो न्याय मिळाल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली आहे.

सद्गगुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट हा सन २००३ ला धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करण्यात आला. त्यावेळी मामांच्या संबंधित घराण्यांच्या वंशजाना विश्वस्थ म्हणून घेवून १९ जणांचा हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. मानद अध्यक्ष म्हणून धैर्यशील भोसले आणि कार्याध्यक्ष म्हणून रामभाऊ मगदूम तर सचिव म्हणून रावसाहेब कोणेकरी यांची नियुक्ती करण्यात आली. यातील आतापर्यंत १९ पैकी ६ विश्वस्थ मयत झाले आहेत तर एका विश्वस्थाने राजीनामा दिला आहे. या देवस्थानचा कारभार वाढत गेला तशा त्रुटीही वाढत आल्या.यातून तक्रारींना सुरूवात झाली. तर सरपंच आणि पोलीस पाटीलांनी कायमपणे ट्रस्टला सहकार्य केले.

पूढे याच ट्रस्टच्या गैरकारभाराबाबत प्रविण पाटील, रविंद्र पाटील, हणमंत पाटील या तिघांनी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम आणि सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्याविरुध्द धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत प्रतिवादी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सचिव कोणकेरी यांच्या बाजूने उभे राहीले तेही चौकशीच्या जाळ्यात अडकले. यातील निरिक्षक अहवालाच्या शिफारशीनुसार २४ एप्रील २०२३ ला ट्रस्ट बरखास्त करण्यात आला. त्यानंतरच्या साऱ्या तक्रारीवरून शिवराज नाईकवडी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक नेमले. ते गेले वर्षभर कार्यरत होते. उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२४ च्या आत नविन विश्वस्थ मंडळ नियुक्तीचा आदेश दिला होता. त्याला अनुसरून या विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली.

आताच्या या विश्वस्थ मंडळात सरपंच पद आणि जुन्या विश्वस्थ मंडळातील नऊजण घेण्यात आले आहेत. पोलीस पाटील हे शेजारच्या मुदाळ गावचे असल्याने त्यांची भुमिका तटस्थ आहे. मुळ घटनेप्रमाणे धैर्यशील भोसले यांना मानद अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. जुन्या परंतू, आता नव्या या विश्वस्थ मंडळाशी धैर्यशील भोसले यांना जमवून घ्यावे लागणार आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ट्रस्टचे कार्याध्यक्ष मगदूम यांचे निधन झाले. त्यानंतर मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी गावातील ५ सदस्यांना विश्वस्थ म्हणून नेमले आणि बनवलेल्या प्रोसिडिंगनुसार ते कार्याध्यक्ष झाले. या मिटिंगसाठी आवश्यक तो कोरम पुर्ण झाला नव्हता. त्यामूळे या सभेस अनुपस्थीत असलेल्या सदस्यांनी ही तक्रार दाखल केली आणि या १० विश्वस्थ सदस्यांनी एकत्र येवून पुंडलिक होसमनी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केल्यामुळे यात वाद वाढत गेला.

या आताच्या नव्या आदेशात गावातील हे ५ विश्वस्थ सदस्य पद रद्द झाले. सध्या ११ जणांचे हे विश्वस्थ मंडळ न्यायालयीन आदेशाने कार्यरत झाले आहे. हा सारा प्रपंच सद्गुरू बाळूमामांचा आहे. ही सारी मामांचीच कृपा आहे. मामांची कारभारावर नजर आहे. तिन्ही विश्वाचे मालक असलेले मामा आपल्याच देवस्थानात गैरकारभार कसा काय सहन करणार. आम्ही सारे निमित्यमात्र आहोत. हे साऱ्यांनी ओळखून घ्यावे व येणाऱ्या काळात चोख कारभार ठेवावा अशी प्रतिक्रिया सरपंच विजयराव गुरव यांनी या संबंधाने दिली आहे. कार्याध्यक्षपद आता नामधारी राहाणार नाही ते फिरत राहील.

मात्र, कारभार स्वच्छ व पारदर्शी होईल असा विश्वास विश्वस्थ आणि सरपंच गुरव यांनी दिला. येणाऱ्या काळात पंढरपूर, शिर्डी, शेगावंच्या धर्तीवर आदमापूरचा विकास करू यासाठी विशेष निधी मिळवून घेवू, असेही सरपंच विजय गुरव म्हणाले.