कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जरांगे यांची तोफ धडाडणार असून या सभेला सुरु होण्यास काही तास उरले आहेत. मात्र आजच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधान आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे येथे अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार होते. मात्र त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला असून ते दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पुर्वनियोजित दौरा नेमका कोणत्या कारणाने रद्द केला असावा यावरुन तर्क – वितर्क लावले जात आहेत.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे येथे अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाच्या साहित्य संमेलनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याचं कार्यक्रम संयोजकांनी म्हटलं होतं. मात्र फडणवीस ही या कार्यक्रमाला हजेरी लावणार का ?

या प्रश्नाला ही अद्याप ठोस उत्तर मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने कोल्हापूर दौऱ्याकडे कानाडोळा केला आहे का ? असा ही सवाल दबक्या आवाजात विचारला जात आहे.