मुंबई (प्रतिनिधी) : बंगळुरूमधील घटनेच्या निषेधार्थ बेळगावसह सीमा भागांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार आंदोलन केले. मात्र, या आंदोलनानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यासंदर्भात कर्नाटक सरकार विचार करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
यावर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकांचा आवाज दाबून हुकूमशाहीची बिजं रोवली जात असतील, तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही, कर्नाटक सरकारने बंदी घालून दाखवावीच, असे थेट आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
संसदेमध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावर एक पक्षीय हुकूमशाही सुरु आहे. यामुळे आमचे १२ खासदारही निलंबित केलेत. आम्ही ती लढाई लढतोय. भाजपशासित राज्यामध्येसुद्धा अशाप्रकारे लोकांचा आवाज दाबून हुकूमशाहीची बिजं रोवली जाणार असेल तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.