प्रतिनिधी (कोल्हापूर ) काही राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, या निवडणूकीत अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा दिला नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत केली.

युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे. तसेच थायलंडसह अशिया खंडातील अनेक देशांसोबत साम्यंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फौंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून कोल्हापुरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा क्षेत्रात यापुढेही तितक्याच जोमाने कार्यरत राहणार असल्याचेही डॉ. नरके यांनी स्पष्ट केले.


डॉ. नरके म्हणाले, शिक्षण, नोकरी आणि उद्योगाच्या निमित्ताने मी 19 वर्षे अमेरिका, आशिया आणि युरोपीय देशात रहिलो. येथील प्रगत शहरांची कोल्हापूरसोबत तूलना करता, येथे मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे ठळकपणे जाणवले. मात्र, राजकीय उदासिनता, प्रबोधन आणि अभ्यासाची कमतरता, योग्य मार्गदर्शन आणि पाठपुरावा नसल्यानेच कोल्हापुरात औद्योगिक, पर्यावरणीय, रोजगार आणि सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्यातून कोल्हापूरची सुटका करणे हे प्रश्न सोडवणे शक्य असल्याचे मी अभ्यासपूर्वक जाणून घेतले. यासाठी कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली. गेली अडीच वर्षे 1150 गावं आणि वाड्यावस्त्यांचा दौरा केला. या दरम्यान ग्रामीण व शहरातील समस्या आणि जनभावना जाणून घेतल्या.


माझ्या अर्थशास्त्रीय अभ्यासाची जोड देवून जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्युप्रिंट तयार केली. यामाध्यमातून कोल्हापूरचा चेहरा-मोहरा बदलण्याची मनिषा घेवून मी लोकसभेच्या रिंगणात उतरलो. सोशल मिडियाच्या माध्यमातून माझं कोल्हापूर, माझं व्हिजन ही संकल्पना कोल्हापूरकरांसमोर मांडली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील लोकांनी कोल्हापूरला पहिल्यांदा मोठे व्हिजन असणारा उमेदवार मिळाल्याची भावना व्यक्त केली.

कोल्हापूरची जनता हाच तुमचा पक्ष म्हणून रिंगणात उतरा, असा आग्रह कोल्हापूरकरांचा होता. पण, अपक्ष रिंगणात राहून या सगळ्या गोष्टी साध्य करणे शक्य नव्हते. भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊले मागे घेण्याची तयारीही आपली हवी. म्हणून या रिंगणातून माघार घेत असलो तरी कोल्हापूरच्या विकासाच्या ध्येयापासून बाजूला होणार नाही. माझ्या परीने कोल्हापूर व येथील जनतेच्या उन्नतीसाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे.

ते पुढे म्हणाले, कोल्हापूरच्या शेती, उद्योग-व्यवसाय-व्यापार, रोजगार, शिक्षण, महिला सबलीकरण, पर्यटन, पायाभूत सुविधा, युवा, कला-क्रिडा, कायदा सुव्यस्था, तंत्रज्ञान केंद्र आदी घटकांचा सखोल अभ्यास केला आहे. या क्षेत्रातील समस्या, सद्‌स्थिती, कारणे आणि उपायोजनांची ब्ल्युप्रिंट तयार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सर्वांगिण विकासाची भरारी घेवू शकतो, हा माझा ठाम विश्वास आहे. यासाठीच मी यापुढेही राजकारण आणि समाजकारणात वेगवेगळ्या व्यासपीठावर सक्रिय राहणार आहे.