हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि मराठी अस्मितेवर आक्रमण करून लूट करणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाला देशातून तडीपार करून इतिहास घडवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. ते वडगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, माने त्यांची राजकीय कारकीर्द संपली होती. उध्दव ठाकरे आणि स्वाभिमानी शिवसैनिकांनी त्यांना ८ दिवसात खासदार केले. परंतु, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसनाऱ्या या खासदाराला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आणि शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. त्यामुळे प्रामाणिक, निष्ठावान, निष्कलंक सत्यजित पाटील सरुडकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून इतिहास घडवा असे आवाहन केले.

तसेच शेतकरी, महिला, कष्टकरी, शेतमजूर, युवकांना देशोधडीला लाऊन महाराष्ट्राची लूट केली आहे. मोठे उद्योगधंदे गुजरातला नेत ते बदला घेत आहेत. अश्यांना छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पळवून लावल्याशिवाय सोडणार नसल्याचा इशारा दिला.

आ. सतेज पाटील यांनी, ही ऐतिहासिक निवडणूक आहे. संविधान बदलू पाहणाऱ्या आणि जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपाला हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा. खासदार धैर्यशील माने यांनी निष्ठा बदलून कोल्हापूरच्या जनतेचा मोठा अपमान केला आहे. या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा.

खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी, सत्यजित पाटील हे प्रामाणिक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्व प्रश्नांची जाण असणारा उमेदवार महाविकास आघाडीने दिला आहे. कोल्हापूरची जनता त्यांना निश्चितच खासदार करून इतिहास घडवणार अशी मला खात्री असल्याचे सांगितले.

यावेळी आ. राजू बाबा आवळे, माजी आ. सुजित मिणचेकर, गुलाबराव पोळ, विद्याताई पोळ, माजी आ. राजू किसन आवळे, महिला आघाडी प्रमुख छाया शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख उध्दव ठाकरे गट संजय चौगुले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बी. के. चव्हाण, माले गावाचे उपसरपंच बंटी पाटील, नेज गावाचे शिवसैनिक बाबसो शिंगे आदी उपस्थित होते.