मुंबई (प्रतिनिधी) : आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती, अशा मजकुराचे ट्विट करत   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारसह सर्वांचे लक्ष एका   महत्त्वाच्या विषयाकडे वेधले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची यादी ‘महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी’ अशा मथळ्याखाली या ट्विटमध्ये पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?,” असे प्रश्न पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना केले आहेत.