मुंबई ( प्रतिनिधी ) सणाच्यानिमित्ताने अनेक नागरिकांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. काही दिवसांवर दिवाळी असल्याने या हंगामात जादा भाडे आकारणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्‍या प्रतिकिलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने सन 2018 रोजी शासननिर्णय निर्गमित करुन निश्चित केले आहेत.

दिवाळीत गर्दीच्या हंगामाच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास संबंधित प्रवाशांनी dycommr.enf2gmail.com या इमेल वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले.

खासगी बस मालकांनी शासन निर्णयानुसार पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाड्याबाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करावा. तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकही प्रदर्शित करावा, असेही त्यांनी निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिले आहेत.