मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोल्हापूर आणि सातारा या दोन जागांची चांगलीच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. तर साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारीची प्रतीक्षा आहे. दोन्ही घराणी ही छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या दोन लोकसभा मतदारसंघांना तेवढेच महत्त्व आहे. तर उदयनराजे हे उमेदवारीसाठी तीन दिवस झालं दिल्लीत ठाण मांडून आहेत. ते अमित शाह यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहेत. तसेच शाहूंच्या उमेदवारीवर बोलताना फडणवीस यांनी साताऱ्यात महाविकास आघाडी उदयनराजे यांना बिनविरोध करणार का असा सवाल केला केला आहे.

महाविकास आघाडीने कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शाहू महाराज यांचा सन्मान राखला जावा, असं अनेकांना वाटतं, याबाबत तुमचं मत काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, समजा साताऱ्यात महायुतीने उदयनराजे यांना तिकीट दिलं तर महाविकास आघाडी त्यांना बिनविरोध निवडून देणार आहे का? तसं असेल तर त्यांनी याबाबतची घोषणा करावी. उदयनराजे यांचाही तेवढाच सन्मान आहे. हे राजकारण आहे. याआधीही राजघराण्यातील व्यक्तींनी निवडणुका लढवलेल्या आहेत. राजकारणात अशा मागण्या होत असतात, असे फडणवीस म्हणाले.

सातारा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून उदयनराजे प्रयत्न करत आहेत. साठी सध्या ते दिल्लीत आहेत. अमित शाह यांची भेट घेऊन ते आपल्या उमेदवारीवर चर्चा करणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळेच उदयनराजे यांना तिकीट मिळण्यास अडचणी येत आहेत. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. उदयनराजे आज गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. उदयनराजे त्यांचं मत अमित शाह यांच्यासमोर मांडतील. त्यानंतर अमित शाह हेच अंतिम निर्णय घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.