चंद्रपूर/वणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. पुढील पाच वर्षात विकासाचा वेग आणखी वाढणार असून विकासाच्‍या या लाटेवर स्‍वार होण्‍यासाठी आणि प्रगतीचे भागिदार बनण्यासाठी विकासालाच मतदान करा, असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा-शिवसेना-राष्‍ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वणी तालुक्‍यातील नायगांव बुज. येथील ग्राम पंचायतच्या पटांगणात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीला ते संबोधित करीत होते. वणीचे विद्यार्थी मोठमोठ्या पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. अनेकांना संशोधन करण्याची इच्‍छा आहे. त्‍यांना त्यांच्या गावातच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्‍यासाठी अत्‍याधुनिक वाचनालय बांधण्‍यात येईल. त्‍याचा लाभ शेजारच्या गावातील विद्यार्थ्‍यांना देखील होणार असून त्‍यांचेही जीवनमान उंचावेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

मोफत अन्न धान्य योजना, घरकुल योजना, आयुष्यमान भारत अशा विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे जीवन सुकर झाल्‍याचे सांगत त्‍यांनी कोव्हिडमध्ये अनाथ मुलांसाठी राबविलेल्‍या विविध योजनांचा उल्‍लेख केला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्याचे सांगत त्‍यांनी फिरत्‍या जनसंपर्क कार्यालयाच्‍या माध्‍यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देत असल्‍याचे सांगितले.