मुंबई – सध्या लोकसभेचं रणांगण सुरु आहे. या लोकसभेत सर्वाधिक लक्ष ज्या मतदार संघाकडे लागून राहिले आहे. ते म्हणजे बारामती मतदार संघ. कारण या मतदार संघासाठी दोन बड्या नेत्यांची लढत पाहायला मिळत आहे. बारामती मतदार संघ मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे जीवाचं रान करत आहेत. बारामती मतदार संघामुळे या दोन्ही बड्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अस म्हणायला काही हरकत नाही. बारामती मतदार संघातून महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे याना उमेदवारी मिळाली. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एक संधी सोडत नाहीयत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर भावनिक आरोप केले आहेत. मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही असा आरोप केलाय यावर आता शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर प्रतिउत्तर दिले आहे .

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे..?

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपला पक्ष फुटला, चोरला, वगैरे वगैरे सुरू आहे, पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होता ना सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. मंत्री पद महत्वाचं की निष्ठा महत्वाची? हे तुम्हीच सांगा, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या मी त्यांच्या पोटी जन्माला आलो असतो वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यांनी सांगितले की, आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोप्प उत्तर आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार एक नंबरचा आहे. अमोल दादा माझ्या भावासारखा आहे. आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, पण आता आपण मुक्त झालो आहोत. पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला, असेही त्या म्हणाल्या. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

काय म्हणाले अजित पवार..?

अजित पवार म्हणाले, मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलला गेलो. आम्ही दिवसरात्र काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला असे अजित पवार म्हणाले. शरद पवार आमचं दैवत आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु प्रत्येकाचा काल असतो. कुठंतरी 80 वर्षांच्या पुढं गेल्यानंतर थांबलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. मी पण आता 60 वर्षांच्या पुढे गेलो, आता किती दिवसं थांबायचं ? आम्हाला कधीतरी चान्स आहे की नाही ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. आम्ही काही चुकीचं वागतो का ? त्यामुळे भावनिक होऊ नका, असे ते म्हणाले.