कोल्हापूर (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी (दि.११) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. तरी कोल्हापुरात हा बंद १०० टक्के यशस्वी करण्याकरिता शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शहरात ५०० दुचाकींची भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथून सकाळी १० वाजता या दुचाकी रॅलीस प्रारंभ होणार आहे. बंद मागील शेतकरी हत्याकांडाचा निषेध, शेतकरी विरोधी कायद्याविरोधात शेतकरी बांधवांना पाठिंबा आदी माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या दुचाकी रॅलीत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.