मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १४ व्या हंगामातून  गतविजेता मुंबई इंडियन्स संघ बाहेर पडला  आहे. २०१८ नंतर मुंबईचा संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. यूएईमध्ये मुंबईची कामगिरी लौकिकाला साजेशी  झाली नाही. संघाने फक्त तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला. निराशाजनक कामगिरीवर चाहत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या ट्विटर हँडलवर खेळाडूंसाठी एक खास संदेश पोस्ट करत त्यांना मोटीव्हेट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

चढ -उतार आणि शिकण्याने भरलेला हंगाम. पण, हे १४ सामने या संघाने गेल्या दोन ते तीन वर्षांत मिळवलेले वैभव हिरावून घेऊ शकत नाहीत. निळा आणि सुवर्ण रंग परिधान केलेला प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला आणि त्याने आपला सर्वोत्तम खेळ केला. आणि हिच कामगिरी आपल्याला संघ बनवते. जे आपण आहोत. एक कुटुंब, असा संदेश रोहितने मुंबईच्या संघाला दिला आहे.