मुंबई : मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या कनर्ल पुरोहितने NIA कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी हिंदुत्ववादी नेत्यांकडून दबाव होता. RSS, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायला लावल्याचंही पुरोहित यांनी म्हटलं आहे

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टात पुरोहित यांचा 23 पानी लेखी जबाब सादर करण्यात आला. एटीएसने राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा पुरोहितांनी आरोप केला. याशिवाय दाऊद इब्राहिम आणि कम्युनिस्टवादी नेता डॉक्टर गणपती या दोघांची भेट झाली होती. या भेटीतून महाराष्ट्रातील नक्षली कारवायांची माहिती आपण भारतीय लष्कराला दिली होती, असा दावा पुरोहितांनी केला.

नेपाळमधून शस्त्र, ड्रग्ज यांचा पुरवठा बंद झाल्यानंतर दंडाकारण्यातून लक्षलवाद्यांना पुरवठा झाल्याची माहिती आपण देत होतो, असा दावा कर्नल पुरोहितांनी केला. महाराष्ट्रातील ठाणे, पालघर आणि मध्य प्रदेश सीमेपर्यंत पुरवठा होत असल्याची माहिती दिली होती. तसंच, 2006-07 मध्ये डॉक्टर झकीर नाईकने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून बनावट नोटा वितरित करण्यात येत होत्या आणि आयएसआयकडून दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिलं जात असल्याचा अहवाल दिला होता, असंही पुरोहित यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यात अनेक जण जखमीदेखील झाले होते. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी , सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथक या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र, नंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.