कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज (रविवार) ललिता पंचमी दिवशी करवीर निवासनी श्री अंबाबाईची हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जातानाची सालंकृत महापूजा साकारण्यात आली. ही पूजा श्रीपूजक अरुण मुनिश्वर, विद्याधर मुनिश्वर, आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते. देवी त्र्यंबोलीने (टेंबलाई) आपल्या चतुराईने कामाक्षाकडील योग दंड काढून घेऊन देवांना पूर्ववत केले. आणि कामाक्षाबरोबर युद्ध करुन त्याचा वध केला. त्या विजयाप्रित्यर्थ अंबाबाईने विजय सोहळा आयोजित केला.

परंतु या सोहळ्याचे त्र्यंबोली देवीला आमंत्रण द्यायचे राहून गेले. त्यामुळे सखी देवी त्र्यंबोली रुसून पूर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. अंबाबाईच्या हे लक्षात आल्यावर ती त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी आज (रविवार) ललिता पंचमी दिवशीतिला भेटायला गेली व तिचा रुसवा काढून दोघींची हृद्य भेट झाली.