मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांना टोला लगावला आहे.

दरम्यान, काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं भाकित शरद पवारांनी वर्तवलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, त्यांनी स्पष्टचं प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भविष्यात शरद पवार गटच काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. धुळे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे यांच्या प्रचारसभेसाठी आज, देवेंद्र फडणवीस धुळ्यात होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?
“पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील. किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल”, असं शरद पवार म्हणाले. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. मी आता काहीही बोलत नाही. सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेसच्या) जवळ आहोत. पक्षाबाबतचे पुढील सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील.