पुणे ( प्रतिनिधी ) गोखले इन्स्टिट्यूटचा आज २९ वा दीक्षांत समारंभात पार पडला. या समारंभात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सर्व स्नातकांना शैक्षणिक प्रवासातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, गोखले इन्स्टिट्यूटचे संशोधन क्षेत्रातील कार्य वृद्धिंगत होत राहो, या संशोधनाचा उपयोग समाजाच्या हितासाठी होत राहो, अशी सदिच्छा याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.


राज्यातील मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोखले संस्थेने अभ्यासपूर्ण संशोधन करून मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अहिंसा आणि वैधानिक मार्गाने गोपाळ कृष्ण गोखले यांनी योगदान दिले. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रेरणेतून १९३० साली सुरू झालेल्या या संस्थेत आरोग्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कृषी, सामाजिक विज्ञान यासारख्या विषयावर संशोधन होत आहे.


आपला देश जगात ५ वी आर्थिक महासत्ता बनला आहे. २०४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळून १०० वर्ष होतील. त्यावेळी आपण जगात पहिल्या ३ क्रमांकावर असू. विद्यार्थ्यांनी आपली सारी बुद्धिमत्ता स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी खर्च करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाचा विचार करून नवीन आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. येत्या २५ वर्षात भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना या कार्यात युवा पिढीने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.


यावेळी संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे विश्वस्त रमाकांत लेंका, सचिव मिलिंद देशमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ‘मेकिंग ऑफ अन इकॉनॉमिक सिटाडेल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थितांना शांततेची शपथ देण्यात आली.