हातकणंगले : सध्या लोकसभा निवडणूकीच वातावरण चांगलच तापल आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने अशी लढत होत आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या अनुषंगाने एका सभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदारांना आवाहन केलंय.या आवाहनाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘म्हसोबाला वर्षाला परडी सोडता तशी परडी मला पाच वर्षातून एकदा मतदानाच्या माध्यमांतून सोडा’, असं आवाहन राजू शेट्टी यांनी मतदारांना केलंय.

यावेळी या सभेत बोलताना शेट्टी म्हणाले, तुमच्या उसाचं राखण कोण करतंय. मीच करतो ना. मी तुमच्या उसाच्या शेतातील म्हसोबा आहे. “आपोआप २००, ३०० रुपये दर जास्त मिळतो का? तुमच्या उसाचं, तुमच्या दुधाचं, तुमच्या गोठ्यातील जनावरांचं राखण करणारा मी म्हसोबा आहे. मग त्या म्हसोबाला वर्षाला परडी सोडता, मला पाच वर्षातून एकदा तरी परडी सोडा की. पाच वर्षातून एकदा परडी सोडायचं म्हणजे मला मत द्यायचं. बाकी काही नाही. ते मत नंतर तुम्हालाच उपयोगाला येणार आहे. त्या मताचा उपयोग तुम्हाला होणार आहे. त्यामुळे तुमच्या उसाचा प्रश्न, दुधाचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न, गोरगरीबांचा प्रश्न निवडून आल्यानंतर आपल्याला मार्गी लावता येतील. सामान्य माणसांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचणार आहे. त्या संसदेला बोलायला लावायचं असेल तर तगडा माणूस तेथे जाणं गरजेचं आहे”.