कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हणमंत साठे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची व रिपब्लिकन पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. साठेंच्या रूपाने रिपाइंचा ढाण्या वाघ हरपल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आ) मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू सहकारी हणमंत साठे यांचे पुण्यात मंगळवारी रात्री निधन झाले. याबद्दल शोक करताना उत्तम कांबळे म्हणतात की, महाराष्ट्रात आजपर्यंत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मांतग आघाडीची धुरा अविरतपणे सांभाळली होती. साठे यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रिपाइंचे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे यांनीदेखील शोक व्यक्त केला.