कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये ‘विद्यार्थी संसद’ (स्टुडंट पार्लमेंट) सारखे उपक्रम राबवून लोकशाही मूल्यांची व निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना करुन द्या, असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात विविध जिल्ह्यांतील प्राचार्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, तहसीलदार शीतल मुळ्ये-भामरे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव प्राचार्य राजेंद्र शेजवळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.

मतदान प्रक्रियेत युवक व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत  देशपांडे यांनी प्राचार्यांकडून सूचना जाणून घेतल्या. तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने महिलांसाठी उखाणा स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा आदी उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ‘Voters Helpline App’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घेऊन आपापल्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याची माहिती घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास अपद्वारे नावनोंदणी करावी. सर्व शाळांमध्ये निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांनी आभार मानले.