कोल्हापूर (प्रतिनिधी) :  खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (रविवार)  भवानी मंडप येथे मराठा समन्वय आणि नेत्यांशी संवाद पार पाडला. यामध्ये सर्वांनी एकत्रितपणे कायदेशीर बाबींचा विचार करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणं गरजेचं आहे. तसेच मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईण, असा सवाल खा. संभाजीराजेंनी केला.

यावेळी खा. संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळावा, ही केवळ आपल्या एकट्याची भूमिका नसून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचीदेखील तीच भूमिका होती. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं ध्येय आहे. काही जणांनी हे आंदोलन मॅनेज असल्याच्या दावा केला. परंतु, मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईन, असा सवाल त्यांनी केला.

आरक्षण मिळवण्यासाठी वातावरणात तणाव निर्माण करण्याची किंवा स्टंटबाजी करण्याची गरज नसून कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर पद्धतीने हे काम पूर्णत्वाला नेणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलने करा, मोर्चे काढा, पण आजूबाजूची परिस्थितीही बघा, असं आवाहन त्यांनी मोर्चेकऱ्यांना केलं. देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गर्दी न करता आणि कोरोनाबाबतच्या नियमांचं कुठलंही उल्लंघन न करता आपला लढा चालू ठेवण्याचं मोठं आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.