मुंबई (प्रतिनिधी) : निर्भया फंडाचा वापर शिंदे गटाच्या सुरक्षेसाठी होणे अतिशय चूक आहे. गृहमंत्र्यांनी याची चौकशी करायला हवी; परंतु गृहमंत्र्यांचा कायदा नियमाप्रमाणे चालत नाही. त्यांच्या मर्जीनुसार चालतो, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिला सुरक्षेसाठीच्या गाड्या फक्त महिला सुरक्षेसाठीच द्यायची आहे; परंतु हे अतिशय दुर्दैवी आहे की, महिला सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्या वेगळ्या कामांसाठी वापरल्या जातात. लोकप्रतिनीधींची सुरक्षा महत्वाची आहेच; परंतु दुसऱ्यांचे काढून घेणे अयोग्य आहे. कुठल्याही सरकारने महिलांची सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. व्हीआयपी कल्चर ज्या पद्धतीने होत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिला अत्याचाराबाबतचे गंभीर गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात व्हायला हवे. चंद्रकांत पाटील यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे आपण त्यावर पडदा टाकायला हवा. काल पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर जी शाईफेक झाली ती अयोग्य होती. चंद्रकांत पाटील यांचा निषेध आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्यांच्यावर शाई फेकणे योग्य नव्हते. मुळातः शाई फेकणे हे अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत अशा गोष्टी बसत नाही.