देवगड (प्रतिनिधी) : गाबीत समाज आणि फागगीते या प्रा. डॉ. अंकुश सारंग आणि प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी लिहिलेल्या ग्रंथास “प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र” यांचा समीक्षा ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलन अध्यक्ष डॉ. सुधाकर बेंद्रे यांच्या हस्ते शाल,सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि काही वाचनीय ग्रंथ डॉ. सारंग यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. उज्वला सामंत यांचाही सत्कार करण्यात आला.

या ग्रंथात प्रथमच होळीच्या वेळी गाबीत समाज कोळीणीला मांडावर नाचऊन, घुमट वाद्य वाजवून जी फाग गीते सादर करतो त्या गीतांचा अर्थ छापलेला आहे. या ग्रंथातील १२ फाग गीतांचा (एनईपी) राष्ट्रीय शिक्षण धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. हा ग्रंथ ललित प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केला असून, ग्रंथास ISBN नंबर प्राप्त झालेले आहे.

यावेळी संस्थेच्या संथापिका लीना देगलूरकर, मकरंद घाणेकर, डॉ. दिलीप नेवसे, विनिता कदम, डॉ. शैलेंद्र भणगे, बबन चौघुले, ॲड. रोहिणी जाधव, मनीष छिद्रावर, किरण वेताळ उपस्थित होते.