पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली. गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच जाहीरनामा ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला त्या वंदना चव्हाणही उपस्थित होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ अशी टीका केली होती. यासंदर्भात पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार थेटच बोलले. ” फडणवीसांना  पराभवाची भिती वाटते. त्यामुळे ते अशा पद्धतीची टीका करत आहेत,” असा टोला पवारांनी लगावला. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, ‘मी विकासावर बोलतो. ते मात्र पराभवाच्या चिंतेतून अशापद्धतीने व्यक्त होत आहेत,’ असंही म्हटलं. ‘महाराष्ट्रात बदलाचा मूड दिसत आहे,’ असं सूचक विधान शरद पवारांनी यावेळी केलं.

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात घेत असल्याच्या सभांवरूनही निशाना साधलाय.नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात पुढील 3 दिवसात 7 सभा होत आहेत. याआधी चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणीत मोदींनी सभा घेतल्या आहेत. “नरेंद्र मोदी यांना भीती वाटते आहे त्यामुळे ते महाराष्ट्रात तीन दिवसात सात सभा घेत आहेत अशी टीका शरद पवारांनी केली आहे.शरद पवार यांनी डॉक्टर पदमसिंह पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. “पाठीमागून निर्माण झालेला लातूर जिल्ह्याचा विकास झाला. मात्र धाराशिवचा झाला नाही. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यापेक्षा इथल्या नेतृत्वाला जास्त संधी मिळाली तरीही विकास होऊ शकला नाही,” असं म्हणत शरद पवारांनी पाटील यांच्यावर टीका केली..