कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे गेल्या दोन वर्षांपासून भिशी भरणाऱ्या गोरगरिबांना चकवा देऊन चालढकल करणाऱ्या भिशी चालकाविरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित तपासी पोलीस कर्मचाऱ्यावर हेरवाड गावातून काही पुढारी राजकीय दबाव टाकत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमच्या घामाचे पैसे बुडाल्यास याला संबंधित राजकीय पुढारी जबाबदार असतील, असे मत भिशी भरलेल्या नागरिकांनी व्यक्त केले आहे.

हेरवाड येथे गेल्या दोन वर्षांपासून काबाड कष्ट करून पोटाला चिमटा लावून काही नागरिक पैसे बचत होतील, या उद्देशाने एका भिशीधारकाकडे पैसे भरत होते; मात्र दोन वर्षे झाली तरीही भिशीधारक त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कष्टकरी आणि गरीब नागरिक यात होरपळत आहेत. पैशाची मागणी करूनही हा भिशीधारक गेल्या दोन वर्षांपासून टोलवाटोलवी करीत आहे.