मुंबई : भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना भाजपने वाऱ्यावर सोडले. आता भाजपला निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही.

मोदी सरकारने मागील 10 वर्ष फक्त अदानीसाठी काम केले. हे सरकारच अदानी सरकार होते पण जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का? असा सवालही पटोले यांनी केला.