कुंभोज (प्रतिनिधी) : येथे बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बाजारपेठेतील मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने विविध घरांतील १० टीव्ही संच जळाले. यात एक लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.

कुंभोज परिसरात रात्री अचानक वारा व विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. यामध्ये मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने संतोष माळी, विनायक माळी, अमोल कळंत्रे, विश्वनाथ बनणे, रमजान अत्तार, रमेश जडे, शीतल कळंत्रे यांच्या घरातील टीव्ही संच, फ्रीज, इन्व्हर्टर जळाले असून, त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेच्या प्रचंड आवाजामुळे परिसरातील जनावरांनाही काही प्रमाणात त्रास झाला. शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी पं. स.चे माजी सदस्य संतोष माळी यांनी केली आहे.