दिल्ली : ‘आप’ला चिरडण्यासाठी स्मोकस्क्रीन तयार करणे आणि खंडणीचे रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू असल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भर कोर्टात ईडीला आरोपांच्या पिंजऱ्यात उभं करताना हे गंभीर आरोप केले. राघव रेड्डी यांनी भाजपला ५५ कोटींचे निवडणूक रोखे दिले असून त्यांनी जामीन विकत घेतल्याचे ते म्हणाले. ईडीने केजरीवाल यांच्या कोठडीत ७ दिवसांची वाढ मागितली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

केजरीवाल न्यायालयात म्हणाले की, “हे एक राजकीय षडयंत्र आहे, जनता त्याला चोख प्रत्युत्तर देईल. केजरीवाल यांनी दिल्ली एलजी व्हीके सक्सेना यांच्या ‘तुरुंगातून सरकार चालवू शकत नाही’ या टीकेवर माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. दरम्यान, केजरीवाल यांना आज त्यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडी संपल्याने रोज एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.रिमांडच्या सुनावणीसाठी आप नेते आतिशी आणि त्यांची पत्नी सुनीता कोर्टरूममध्ये उपस्थित होते.

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘हे प्रकरण २ वर्षांपासून सुरू आहे. मला अटक करण्यात आली आहे. मला कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. सीबीआयने ३१,००० पानांचा अर्ज दाखल केला असून, २९० हून अधिक साक्षीदार तपासण्यात आले आहेत. ईडीने २०,००० हून अधिक पानांचा दावा दाखल केला आहे. माझे नाव फक्त ४ स्टेटमेंटमध्ये आलं आहे. हे सध्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी पुरेसे आहे का? असा सवालही केजरीवाल यांनी केला आहे.