मुंबई (प्रतिनिधी) : . जनाब संजय राऊत यांनी ‘सामना’चे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय, अशा  शब्दांत ट्विट करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

लखीमपूर खेरी प्रकरणात काँग्रेस  नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दिलेल्या लढ्याबाबत शिवसेना खा.  संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. ‘सामना’मधील आपल्या रोखठोक या सदरामधून राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. आता पडळकर यांनी या लेखाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत राऊत यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, प्रियंका गांधींच्या अटकेनं व संघर्षानं देश खडबडून जागा झाला. ४ ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं अस्तित्व देशात आहे. व ते अस्तित्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. चार खून पचवून सुखानं झोपलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची झोप उडवण्याचं काम प्रियंकांनी केलं आहे, असे राऊत यांनी लेखात म्हटले आहे.