आजरा (प्रतिनिधी) : गेले कित्येक दिवस वादाचा बनलेल्या बेअरिंग चोरी प्रकरणाच्या मुद्द्याला पोलिसांच्या तपासात वेगळेच वळण मिळाले. चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक आरोपी झाले आहेत. कार्यकारी संचालकसह ५ जणांना पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली असून, या प्रकरणात आणखीन गळाला मासे लागण्याची शक्यता आहे.

आजरा कारखान्यातून ६ बेअरिंग चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी आजरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तपास सुरुच असताना कारखाना संचालकांनीही चौकशी समिती स्थापन केली होती. ७ सदस्यीय या समितीने ३४ जणांना जबाबदार धरले होते. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत निवेदन देऊन योग्य तपास करण्याची मागणी केली होती.

सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी सुमारे ६० जणांची कसून चौकशी केली. चोरीच्या सर्व बाबी तपासल्या. या प्रकरणात स्क्रॅप घेणारी व्यक्ती जैनूल शमशाद खानवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जबाबात त्याने प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण (रा. पेद्रेवाडी), स्टोअर किपर दिनकर ऊर्फ गुलाब बाबूराव हसबे (रा. चांदेवाडी), सुरक्षा अधिकारी भरत गणपती तानवडे (रा. देवर्डे) व वॉचमन मनोहर यशवंत हसबे (रा. चांदेवाडी) यांच्या सांगाण्यावरुन आपण या बेअरिंग चोरल्याची कबली ठेकेदार खान याने दिली. यानुसार पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले. या चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांच्या तपासात गेटपास, रजिस्टरवर खाडाखोड, स्टोअर किपर विभाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. मुद्देमाल अद्याप ताब्यात मिळालेला नाही. या मोहिमेत बी. एस. कोचरगी, शिवाजी बामणे, दत्तात्रय शिंदे, संतोष घस्ती, अजित हट्टी यांचा समावेश होता. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शैलेश बलकवडे, अपर अधीक्षक जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला. कारखान्यात एकही सीसीटीव्ही नसल्याचे पोलीसांनी सांगितले. हा खर्च कारखान्याला परवडणारा नसल्याने सीसीटीव्ही लावले नसल्याचे आश्चर्यकारक उत्तर मिळाले आहे.