कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली सात वर्षे समाजातील तृतीयपंथी समाजाला सोबत घेऊन,समान वागणूक देऊन रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूर या क्लबचे सुरु असलेले समाजकार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे, असे मोश्मी आवाडे यांनी सांगितले.

रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूरच्या आठव्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ. प्रेरणा पाटील-शेळके यांनी अध्यक्ष म्हणून, तर दर्शन बागी व ओम हत्तरकी यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला. गेली सात वर्ष क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना होत असलेली मदत व क्लबकडून जपले जात असलेले समाजहित याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र सरकारच्या आवाहनानुसार देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.

प्रा. महादेव नरके यांनी विविध उदाहरणांचा दाखला देत क्लबचे काम चांगल्या पद्धतीने कसे पुढे न्यायचे याबाबत मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष तेजस सावंत यांनी मागील वर्षातील कामाचा आढावा घेतला. तर पंकज बामणे यांनी सेक्रेटरीयल रिपोर्ट सादर केला. यावेळी राज कोरगावकर, साहिल गांधी, सौरभ कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.