कोल्हापूर (प्रतिनिधी) साने गुरुजी वसाहत, साळोखेनगर आणि शिवगंगा कॉलनी यांना जोडणाऱ्या पुलाची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी ‘आप’च्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांच्याकडे केली.

या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. पुलावरील रस्त्याची एक बाजू खचलेली आहे. हा रस्ता खचल्याने अरुंद झाला असून, अवजड वाहनासाठी अत्यंत धोकदायक बनला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

पुलाच्या दुरुस्तीसंबंधी प्रस्ताव पाठवला असून, त्याला साडेसहा लाखांचा निधी मंजूर झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर लवकरात लवकर कार्यवाही करून वर्क ऑर्डर काढावी, अशी मागणी ‘आप’ शिष्टमंडळाने केली. डॉ. उषा पाटील, दत्तात्रय बोंगाळे, अभिजित कांबळे, रवींद्र राऊत, मयूर भोसले, किशोर खाडे आदी उपस्थित होते.