कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पूर्व प्राथमिक ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करून प्रत्येक विभागातून जिल्हा स्तरावर पहिले तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत.

या स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. निबंध दि. ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (DIET) शाहूपुरी, ३ री गल्ली, बी. टी. कॉलेज परिसर, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत. या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी कळविले आहे.

पूर्व प्राथमिक शिक्षण (अंगणवाडी सेविका)- प्राथमिक शिक्षण पहिली ते ८ वीला अध्यापन करणारे शिक्षक, ९ वी ते १२ वीला अध्यापन करणारे शिक्षक, पदवी आणि पदव्युत्तर पदवीला अध्यापन करणारे प्राध्यापक, डी.एड व बी.एड अध्यापकाचार्य व प्राध्यापक यांना निबंध स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

ही निबंध स्पर्धा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमातील अंगणवाडी सेविका,  शिक्षक, अध्यापकाचार्य व प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित केली आहे. निबंध लेखनाचे माध्यम मराठी भाषा असेल. निबंध लेखनाची शब्द मर्यादा २५०० ते ३००० एवढी असावी. निबंध लेखनाचे संदर्भ लिहिणे अनिवार्य आहे. निबंध हा गुगल इनपुटमध्ये टाईप करून फॉन्ट साईज शीर्षकांसाठी १४ व मजकुरासाठी १२ इतका असावा. निबंध लेखनामध्ये कोणत्याही प्रकारच्या आकृत्या, चित्रे समाविष्ट करु नयेत. निबंध स्पर्धेमध्ये प्रत्येक स्तरातील प्रथम तीन क्रमांकाचा संस्थेमार्फत यथोचित सन्मान करण्यात येईल.

या निबंधासोबत निबंध हा मी स्वत: लिहिलेला आहे, यासाठी संदर्भ साहित्याचा फक्त आधार घेण्यात आलेला आहे. संदर्भ साहित्यातून कोणताही मजकूर जशाच तसा घेण्यात आलेला नाही. याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे. निबंधासोबत मुख्याध्यापक किंवा कार्यालय प्रमुखाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे. जिल्हयातील निबंध स्पर्धेसाठी रोटरी क्लब तसेच शिक्षक पतपेढयांचे सहकार्य लाभणार आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी व इतर घटकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही शेख यांनी केले आहे.