मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. Dतरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे, त्यामुळे भाजपाचा दारुण पराभव होणार हे अटळ आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहे, जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवले. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवले, शेतमालाला दीडपट भाव देणार, उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवले, कामगारांना देशोधडीला लावले, महिलांना फसवले, त्यामुळे जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. देश विकून देश चालवला त्याला विकास म्हणणार का? गब्बरसिंग टॅक्स आणून जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिशे भरले याला विकास म्हणतात का? असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले.

विदर्भाची जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलेली आहे, यावेळीही जनतेचे मोठे समर्थन मिळाल्याचे दिसले, त्यामुळे नागपूर, रामटेक, गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या पाचही मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.