कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, महसुल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांनी विरोध केला. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असेल, तर ती स्वीकारणार नाही. योग्य मोबदला मिळणार असेल, तरच पंचनामे करा, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी आज (शनिवार) खासदार, आमदार, अधिकारी यांच्यासमोर घेतला. 

शेतकऱ्यांच्या जमिनी बांध तुटून गेल्याने माती व दगड-गोटे पडून एकत्र झाल्या आहेत. जमिनीचे क्षेत्र कोणाचे व किती हे देखील कळणार नाही. त्यासाठी जमिनीची मोजणी शासनाने आधी करावी. तसेच योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

यावर खासदार संजय मंडलिक, भुदरगडचे आमदार प्रकाश अबीटकर, अधिकाऱ्यांनी  जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. मदतीचे ठोस आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास सांगितले.

दरम्यान, मेघोली लघु पाटबंधारे तलावाच्या व्हॉलमधील गळतीमुळे बुधवारी (दि.१) रात्री धरण फुटले. २२ जुलैरोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पूर्वीच असणारी व्हॉलमधील गळती वाढत चालली होती. याबाबतची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. पण याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी मेघोलीसह सोनुर्ली, नवले, तळकरवाडी, ममदापूर व वेंगरुळ येथील शेतकरी उपस्थित होते.