नवी दिल्ली : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आणि आफ्रिकेविरूद्धची मालिकाही जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ९९ धावांमध्ये आटोपला. यावेळी कुलदीप यादवने ४ गडी बाद केले. ९९ धावांचा पाठलाग करताना भारताने सुद्धा दमदार फलंदाजी करत हा सामना ७ विकेट्स राखत जिंकला. भारताने या विजयासह आता वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे. १९ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने एका वर्षात ३७ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. भारताने या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारताचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकसा बाद करून आफ्रिकेला पहिला धक्का मिळाला. त्यानंतर एका पाठोपाठ आफ्रिकेचे सर्व फलंदाज बाद झाले. कुलदीप यादवने सर्वाधिक ४ गडी बाद केले असून, त्याने ४.१ षटकात १८ धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज नदिमने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. आफ्रिकेच्या फक्त तिघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. ६६ धावांवर त्यांचा निम्मा संघ बाद झाला होता. कुलदीप यादवने धमाकेदार कामगिरी केली. भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला फक्त ९९ धावावर रोखण्यात यश आले.

दक्षिण आफ्रिकेचे १०० धावांचे आव्हान माफक वाटत होते, पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का बसला. धवनला यावेळी फक्त आठ धावा करता आल्या. पण धवन बाद झाला असला तरी त्यानंतर इशान किशन आणि शुभमन गिल यांनी दमदार फटकेबाजी केली. गिल यावेळी गोलंदाजांवर तुटून पडत होता. त्यावेळी इशान किशनलाही मोठी खेळी साकारण्याची संधी होती. तो यावेळी १० धावांवर बाद झाला.