कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रूपये द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ झाली असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.


पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आजच्या बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसू लागले आहे. कृषी मुल्य आयोगाने एफआरपीमध्ये केलेली वाढ ही चुकीची असून यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. शेतक-यांची एक टक्का रिकव्हरी इथेनॅालसाठी घेतल्यानंतर 307 रूपये शेतक-यांना दिले जातात, मात्र यामधून कारखान्यांना जादा पैसे मिळतात.

वारवांर आंदोलने करून जर पैसे मिळत नसतील तर मोठा संघर्ष सुरू होईल. आतापर्यंत राज्यातील 8 साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा जादा दर दिलेले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने सक्षम असून ऊस दर नियंत्रणाच्या मान्यतेची तांत्रिक अडचण सांगून दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत. असा ही आरोप यावेळी केला.


या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 15 आक्टोबर पुर्वी हिशोब पुर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व कारखान्यांना दिला असल्याचं ही शेट्टी यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, यांचेसह जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक, साखर सहसंचालक अशोक गाडे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, सागर शंभुशेटे, विक्रम पाटील, राम शिंदे, शैलेश आडके, यांचेसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.