कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दूधगंगा धरणाची एकूण पाणी साठा क्षमता 25.40 टी.एम.सी.असून मागीलवर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर तो 20.54 टी एम सी करण्यात आला होता. मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणी साठा सिंचनासाठी अपूरा झाला होता.

यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणी साठा 24.22 टी.एम.सी. व त्यातील उपयुक्त पाणीसाठा 22.82 इतका करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत आवर्तन सुरू असून सध्याचा एकूण पाणी साठा 23.25 तर उपयुक्त पाणीसाठा 21.85 टीएमसी आहे. आता दूधगंगा धरणाच्या गळती प्रतिबंधक कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येईल.


परंतु सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, रब्बी व उन्हाळी हंगामा करिता पिकांची निवड करताना पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करण्यात यावी. तसेच ऊस पिकाचे निवड करताना नदीच्या लाभक्षेत्रात नेहमी प्रमाणे लागण करून दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, तसेच मागील वर्षी पेक्षा जास्त ऊसाची लागण करु नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.