हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची, राहाण्याची व्यवस्था करण्याचे, पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

अनेक भागातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. वसमत तालुक्यातल्या कुरुंदा परिसरात मध्यरात्री ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले आहे. कुरुंदा गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. कुरुंदा गावातील अनेक नागरिकांनी घराच्या छतावर रात्र जागून काढली. आपला जीव मुठीत धरून हे नागरिक रात्रभर या धो-धो पावसात हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत होते.

आसना नदीला आलेल्या पुरामुळे गावात जवळपास ४ ते ५ फूट पाणी शिरले होते. गावात नदीकाठची काही घरे पाण्याखाली सुद्धा गेली होती. उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिकेसुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.