कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील उत्तर भारतीय नागरिकाकडून पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा करण्यात आली. आज (रविवार) रोजी पंचगंगा घाटावर उत्तर भारतीयांच्यामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या छटपूजेला सुरुवात झाली. तसेच मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, दिल्लीचे महाराष्ट्राचे महामंत्री अजय राम सिंह आणि कोल्हापूर जिल्हाचे महामंत्री उपदेश सिंह यावेळी उपस्थित होते.


तसेच उद्या (सोमवार) पहाटे ५.३० वाजता नदीच्या पाण्यात शुद्धी करून उगवत्या सूर्याला जल आणि दूध अर्पण करून पूजा करण्यात येणार आहे. यावेळी हजारो उत्तर भारतीय स्त्रियांनी पंचगंगा घाटावर ही पवित्र पूजा केली. छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते.


कोल्हापूरमध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. यासाठी दरवर्षी ही पुजा पंचगंगा नदी घाटावर करण्यात येते. असे अजय राम सिंह आणि उपदेश सिंह यांनी सांगितले.


यावेळी कामेश्र्वर मिश्रा, आर.के.त्रिपाठी, सुजित झा, ललन सिन्हा, रजनी सिंह, नूतन सिंह, कविता सिंह, रिना त्रिपाठी यांच्यासह अनेक उत्तर भारतीय स्त्रियांनी पुजा केली.