जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू  झाला आहे, तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काही लोक बेपत्ता असल्याचीही माहिती आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवार दल, राज्य आपत्ती  निवारण दलाचे जवान तसेच पोलीस आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत.

ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पवित्र अमरनाथ गुहेपासून अवघ्या १ ते २ किमी अंतरावर घडली. ढगफुटीमुळे  डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने भाविकांचे सुमारे २५ तंबू आणि ३ लंगर वाहून गेल्याचे जवानांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. या ढगफुटीत पुण्यातील धायरी भागात राहणारे महेश भोसले आणि सुनीता भोसले हे अमरनाथ यात्रेत अडकले आहेत.

एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी पथकाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळालीय. तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अकरा भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.