परळी (प्रतिनिधी) :  बीड जिल्ह्यातील परळी गावातून तीन दिवसात तब्बल १२४ गाढवं चोरीला गेल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या अज्ञात चोरट्याने शहरातील विविध भागातून १८ लाख ३४ हजारांच्या गाढवांवर डल्ला मारला आहे. यामुळे आता पोलिसांना दिवाळीच्या तोंडावर गाढवं शोधण्याची वेळ आली आहे.

ही गाढवं परळी शहरात वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची असून ३४ मजुरांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. याबाबत पोलीसांनी, परळी शहरातून गाढवं चोरीला गेल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. तक्रारीबाबत आम्ही खातरजमा करीत आहोत. या प्रकरणात तथ्य आढळलं तर आम्ही गुन्हा दाखल करणार असून याबाबतचा तपास सुरू असल्याचे सांगितले.