कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीवर 25 टीएमसीचे धरण आहे. या धरणातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध गावांना पाणी मिळते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून जवळपास 60,000 हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणण्यात आले आहे. यापैकी दूधगंगा डावा कालवा करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावाजवळून जातो.

या कालव्याच्या वरच्या बाजूस असलेल्या 5,000 हेक्टर क्षेत्रासाठी कालव्यावरून उपसा सिंचन योजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या उपसा सिंचन योजनेमुळे येथील शेतकऱ्यांचे पाण्याचे हाल संपुष्टात येणार असून शेतकरी समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

सदरच्या योजनेसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक गेली आठ वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. कृष्णा पाणी वाटप तंत्रानुसार महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा वापर करण्याच्या दृष्टीने दूधगंगा प्रकल्पाचे फेर नियोजन केल्यास दिंडनेर्ली उपसा सिंचन योजनेसाठी 0.80 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. हे पाणी आजूबाजूच्या बारा गावांच्या शेतीला ओलिताखाली आणण्यासाठी पुरेसे आहे.

ही योजना झाल्यास दिंडनेर्ली, हणबरवाडी, वडगाव, वड्डवाडी, गिरगाव,कोगील खुर्द,कोगील बुद्रुक, कणेरी, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, नंदगाव आणि जैताळ या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल त्यामुळे या योजनेला तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.