चिपळूण – पालवण : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला तर खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना नेला आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला मात्र या अनंत गीतेंकडे दोनवेळा हेच खाते असताना माझ्या कोकणात किंवा या मतदारसंघात एखादा कारखाना उभा केला नाही किंवा रोजगार उपलब्ध केला नाही असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी महायुतीच्या पालवण येथील जाहीर प्रचार सभेत केला.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले, आठवेळा भाजपसोबत निवडणूका लढलेले अनंत गीते आज त्याच भाजपवर आरोप करत आहेत एवढा कृतघ्न माणूस कुठे पाहिला नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसेच अनंत गीते स्वतः च्या सावलीला भीत आले म्हणूनच त्यांनी इतक्या वर्षात समाजातील एकाही नेतृत्वाला उभे केले नाही असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी केला.

अजित पवार यांनी पाच कोटी रुपये देऊन पाया रचला आणि एकनाथ शिंदे यांनी ७ कोटी देऊन कळस ठेवला त्यामुळे समाजोन्नती संघाची वास्तू मुलुंड सारख्या ठिकाणी उभी राहिली. याचा आनंद व्यक्त न करता अतिशय दु:ख झाल्याने त्या वास्तूच्या उद्घाटनालाही अनंत गीते आले नाहीत ही शोकांतिका आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी समाचार घेतला.

प्रगतशील राज्यात जेवढा विकास झाला त्याचपटीने ईशान्य भागातही पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभ्या केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले याचा अभिमान आम्हाला आहेच त्याचबरोबर ते मुस्लिम बांधवांची मशिदही उभी करत आहेत हे मात्र मुस्लिम समाजाला न सांगता निवडणूकीत प्रचाराला मुद्दे नसल्याने समाजासमाजामध्ये दुषित वातावरण निर्माण करुन नरेंद्र मोदींना नाहक बदनाम करु पहात आहेत हे खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.

कोकणाला ७२० किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवर मोठया प्रमाणात पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारल्या आहेत हे आमचे काम आहे असे सांगतानाच माझ्या कोकणातील तरुण मोठया प्रमाणात मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. त्यांना त्यांच्या घराजवळ रोजगार कसा उपलब्ध करता येईल यादृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

पुढील पाच वर्षे रोडमॅप ठेवून काम करणार आहे. तुम्ही मला घड्याळ चिन्हावर मतदान करुन साथ द्या तुमच्यासोबत कायम राहिन असा विश्वास सुनिल तटकरे यांनी जनतेला दिला. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण करत असताना त्यांचा मुलगा मात्र कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतोय हे दुर्दैव आहे असा थेट हल्ला माजी मंत्री रामदास कदम यांनी पालवण येथे केला.

अनंत गीते हे शेवटचे अस्त्र समाजाचे काढतात आणि मग जे मुंबईत जातात ते पुन्हा मतदारसंघात फिरकतच नाही असा त्यांचा इतिहास आहे असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला. कुणबी समाजाला सुनिल तटकरे यांच्यामुळे वसतीगृह मिळाले आहे. उलट हे वसतीगृह होऊ नये म्हणून कुणबी समाजोन्नती संघाचे खाते गोठवण्याचे काम केले असा थेट आरोपही उदय सामंत यांनी केला.

४५ वर्षानंतर पुन्हा एकदा मी कुणबी समाजासाठी काम करेन असे आजही अनंत गीते बोलत आहेत. परंतु सुनिल तटकरे यांनी कुणबी समाजातील मुलांसाठी वसतीगृह उपलब्ध करून दिले आहे. एमआयडीसीची जागा कशीही उपलब्ध करून दे सांगितल्यावर मी तात्काळ जागा उपलब्ध करून दिली. होय कुणबी समाजासाठी सुनिल तटकरे यांनी काम केले आहे. त्यामुळेच या निवडणुकीत सुनिल तटकरे यांना मोठया मताधिक्याने विजयी करा असे आवाहन उदय सामंत यांनी केले.

गुहागर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने आपला खासदार निवडून गेला पाहिजे यादृष्टीने काम करा. सुनिल तटकरेसाहेब केंद्रात मंत्री झाले तर या भागातील समस्यांची जबाबदारी आम्ही घेऊ असा शब्द आमदार शेखर निकम यांनी दिला.