मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी उद्या (शुक्रवारी) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मंत्रिमंडळात भाजपाचे आठ, तर शिंदे गटाचे सात आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे. आता या १५ जणांमध्ये कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीककडे शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरवाजात पोहोचला आहे, तर दुसरीकडे राज्यात ३० जूनला शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, हेच उत्तर प्रत्येकवेळी देत होते. त्यामुळे विरोधकांनी कायम यावर टीका केली आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी देखील कालच याबाबत सांगितले होते की, ‘मंत्रिमंडळ विस्तारावरून गैरसमज पसरवला जात आहे. पुढील २ ते ४ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’. शिवाय शनिवारी, ६ ऑगस्टाला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझादी का अमृतमहोत्सव समितीची बैठक होणार असून, त्या बैठकीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगण्यात येते.

मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गटाला ३५ टक्के तर, भाजपाला ६५ टक्के मंत्रीपदे मिळतील. जम्बो मंत्रिमंडळ पद्धतीला आळा घालण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाचा विस्तार ४२ मंत्रिपदांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. ते ध्यानी घेता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता उर्वरित ४० पदांपैकी शिंदे गटाला १५ तर, भाजपाच्या वाट्याला २५ मंत्रीपदे येतील. यात राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे आता मंत्रीपदाची लॉटरी कोणाकोणाला लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.